नांदेड : प्रतिनिधी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतक-यांचा संताप अखेर उफाळून आला आहे. विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतक-यांनी मंगळवारी २८ रोजी हळदीचा लिलाव (बिट) बंद पाडत ठिय्या आंदोलन केले.
आंदोलनकर्त्या शेतक-यांचे म्हणणे आहे की, हळदीच्या लिलावात एकाच दर्जाच्या मालाला तब्बल ६ हजार ते ७ हजारांपर्यंत दरातील तफावत दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळत नसून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेतक-यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, माल विक्रीनंतर पैसे मिळण्यासाठी सुमारे ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शेतीसाठी खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि इतर खर्चासाठी तातडीने पैशांची गरज असताना इतका विलंब होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. याशिवाय, ज्यांना तातडीने पैशांची आवश्यकता असते, अशा शेतक-यांना ३ टक्के बिल्टी कपात करून रक्कम दिली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांची अशा प्रकारे पिळवणूक होत असल्याचा आरोप करत ही पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.
बाजार समितीतील मूलभूत सुविधांबाबतही शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दूरवरून माल घेऊन येणा-या शेतक-यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तसेच ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनांसाठी पार्किंगची योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
















