लातूर जिल्हा बँकेचे ३५,४०९ शेतकरी पात्र
लातूर : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २ जून २०२६ शासन निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ जाहीर केलेली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व राज्याचे सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या पहिल्या व दुस-या यादीमध्ये लातूर जिल्हा बँकेचे ३५ हजार ४०९ शेतकरी पात्र ठरलेले असून रु. २१९ कोटी रक्कमेचा लाभ शेतक-यांना मिळणार आहे.
प्राप्त यादीपैकी आजपर्यंत २२ हजार २८४ शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण केलेले आहे. अद्यापही १३ हजार १२५ शेतक-यांनी (ई-केवायसी) पूर्ण केलेले नाही त्यामुळे कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी यादीतील उर्वरित पात्र शेतक-यांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून घ्यावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केलेले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पात्र शेतक-यांचा ‘अॅग्रीस्टॅक आयडी’ असणे व आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील ८९३४ शेतक-यांनी अजूनही ‘अॅग्रीस्टॅक’ मंचावर नोंदणी न केल्यामुळे त्यांचा फार्मर आय डी निघाला नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) होऊ शकलेले नाही, त्यामुळे अशा शेतक-यांनी तात्काळ आपले ‘अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी’ काढून घ्यावेत व आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. ज्या शेतक-यांकडे शेतजमीन उपलब्ध नाही अशा शेतक-यांचे ‘अग्रीस्टॅक फार्मर आयडी’ निघणे कठीण असल्यामुळे अशा शेतक-यांच्या बाबतीत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
















