नवी दिल्ली : नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजलेला असतानाच मुंबई आणि पुण्यासह देशातील १८ शहरांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्राच्या गृह मंत्रालयाने पूर जोखमीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या १५ राज्यांतील १८ प्रमुख शहरांची यादी तयार केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली.
शहरी पूर जोखीम निवारण कार्यक्रमांतर्गत नियोजनासाठी गृह मंत्रालयाने एकूण ५,५२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी मुंबईसाठी ७०७.७१ कोटी रुपये, पुण्यासाठी २८६.६९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मुंबईला १५० कोटी रुपये, तर पुण्याला ७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, दुस-या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या शहरांना अद्याप एकही रुपयाचा निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती राय यांनी दिली. पुराची उच्च असुरक्षितता, दाट लोकवस्ती आणि प्रमुख क्षेत्रीय घटकांचे एकत्रित मूल्यांकन करून या शहरांची निवड करण्यात आली आहे.
पुरामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी गृह मंत्रालयाने शहरी पूर जोखीम निवारण कार्यक्रम सुरू केला आहे. गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुण्यासह चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद आणि बंगळुरू या सात महानगरांत हा कार्यक्रम राबविण्यास मंजुरी दिली आहे. दुस-या टप्प्यात भोपाळ, भुवनेश्वर, गुवाहाटी, जयपूर, कानपूर, पटणा, रायपूर, तिरुवनंतपुरम, विशाखापट्टणम, इंदूर आणि लखनौ या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
अनियोजित विकासामुळे वाढली जोखीम
शहरांचा अनियोजित विकास, सिमेंटचे पक्के रस्ते आणि पाणी जिरण्यासाठी अपुरी मोकळी जागा यामुळे पूरस्थितीचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक जलमार्ग आणि तलावांवर झालेले अतिक्रमण तसेच पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने अनेक शहरांमध्ये पूरसंवेदनशीलता वाढली आहे.
रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न
भोतेकोशी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पुरामुळे अनेक मार्गांवर माती आणि ढिगारा साचला आहे. सशस्त्र पोलिस दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक रस्ते मोकळे करण्याच्या कामात सहभागी झाले आहेत. ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
३० हून अधिक देशांचे नागरिक बेपत्ता
नेपाळच्या पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, ३० हून अधिक देशांतील पर्यटक बेपत्ता असून यात पुढील देशांच्या पर्यटकांचा समावेश आहे.
अमेरिकेचे ६५
मलेशियाचे ५१
युक्रेनचे ५३
ऑस्ट्रेलियाचे ३५
ब्रिटनचे ३३
कॅनडाचे २५
दक्षिण कोरियाचे ९
सिंगापूरचे ८
जर्मनीचे ८
रशियाचे ८
दक्षिण आफ्रिकेचे ६
लॅटव्हियाचे ६
जपानचे ५
न्यूझीलंडचे ५
फ्रान्सचे ४
बेल्जियमचे ३
स्पेनचे ३
याशिवाय इटली, कझाकस्तान, पोर्तुगाल, आयर्लंड व नेदरलँड्समधील प्रत्येकी दोन जण बेपत्ता आहेत. बेलारूस, फिनलंड, हंगेरी, इस्रायल, लिथुआनिया, फिलिपिन्स, बल्गेरिया, स्वित्झर्लंड, सर्बिया आणि स्वीडन या देशांतील प्रत्येकी एक नागरिक बेपत्ता असल्याचे पर्यटन मंडळाने सांगितले. बेपत्ता ५३ युक्रेनियन नागरिकांपैकी ४६ पर्यटक असून नेपाळी अधिका-यांचा त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.
















