नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कौन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरने प्रसिद्ध केलेल्या एका स्वतंत्र पाहणीनुसार बहुतांश भारतामध्ये नैऋत्य मोसमी पर्जन्यवृष्टीच्या टक्केवारीने उसळी घेतल्याचे दिसत असून ५५ टक्के तालुक्यांमध्ये गेल्या दहा वर्षांत (२०१२-२०२२) १० टक्क्यांहून अधिक इतकी लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यात राजस्थान, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे काही भाग अशा पारंपरिकदृष्ट्या कोरड्या समजल्या जाणा-या प्रांतांमधील तालुक्यांचाही समावेश आहे. यापैकी जवळ-जवळ एक चतुर्थांश तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानामध्ये ३० टक्क्यांची ठळक वाढ झाल्याचे दिसते.
भारताच्या ४,५०० हून अधिक तालुक्यांमधील ४०० वर्षांच्या कालावधीतील (१९८२-२०२२) पर्जन्यमानाचे बारकाईने विश्लेषण करणा-या डिकोडिंग इंडियाज चेंजिंग मान्सून पॅटर्न्स या सीईईडब्ल्यूच्या पाहणीमधून मान्सूनचे गेल्या दशकातील वेगाने बदलणारे स्वरूप दिसून येत आहे. हवामान बदलाचा वाढता वेग या बदलास कारणीभूत असू शकेल. या तालुक्यांमध्ये वाढलेला पाऊस हा अनेकदा अल्प काळात होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी असल्याने ब-याचदा पूर आल्याचेही सीईईडब्ल्यूच्या या पाहणीतून दिसून आले. नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात भारतीय तालुक्यांमधील ३१ टक्के तालुक्यांमध्ये गेल्या दशकभरात दरवर्षी मुसळधार पावसाच्या दिवसांत चार ते पाच दिवसांची वाढ दिसून येत आहे.
२०२३ या वर्षाची जागतिक पातळीवरील सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झालेली असताना आणि २०२४ मध्ये हाच कल सुरू राहील, असा अंदाज असताना तीव्र अशा वातावरणीय घटनांच्या रूपात हवामानाच्या समस्यांचा परिणाम दिसून येणार आहे. २०२३ मध्ये चंदीगढमध्ये एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी जवळ-जवळ निम्मा पाऊस अवघ्या ५० तासांमध्ये पडला, तर केरळमध्ये जून महिन्यात पर्जन्यमानात ६० टक्के तूट दिसून आली.
सीईईडब्ल्यूचे सीनीअर प्रोग्राम लीड डॉ. विश्वास चितळे म्हणाले, की, भारत २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सज्ज होत असताना अर्थव्यवस्थेच्या भवितव्याला पर्जन्यमानाच्या अधिकाधिक अनिश्चित बनत चाललेल्या प्ररूपापासून सुरक्षित राखण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल. मान्सूनचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर प्रभाव पडतो.
मोसमी वा-याच्या परिवर्तनाचे संकल्पन
सीईईडब्ल्यूच्या पाहणीतून गेल्या चाळीसहून अधिक वर्षांमध्ये भारतभरामध्ये नैऋत्य आणि ईशान्य दोन्ही मोसमी वा-यांच्या परिवर्तनशीलतेचे संकल्पन तर केले गेलेच आहे. पण त्याचबरोबर ही पाहणी तालुका स्तरीय पर्जन्यमानाची माहिती खुलेपणाने उपलब्ध करून देते.
मोक्याच्या क्षणी पावसात घट
वाढलेल्या पर्जन्यमानाचे संपूर्ण मोसमामध्ये आणि महिन्यामध्ये योग्य प्रकारे वितरण झालेले दिसत नाही. नैऋत्य मोसमी पावसामध्ये घट झालेल्या एकूण तालुक्यांपैकी बिहार, उत्तराखंड, आसाम आणि मेघालय सारख्या राज्यांमधील ८७ टक्के तालुक्यांमध्ये जून आणि जुलै या मान्सूनच्या सुरुवातीच्या आणि खरीप पेरण्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण महिन्यांमधील पावसात घट झाल्याचे दिसून आले.
ऑक्टोबरमध्ये पाऊस
दुस-या बाजूला भारतातील ४८ टक्के तालुक्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात १० टक्क्यांहून अधिक पर्जन्यवृष्टी झाल्याचे दिसून येत आहे. नैऋत्य मान्सून उपखंडामधून परतण्यास होणारा उशीर या अधिकच्या पावसाचे कारण असू शकेल. या गोष्टीचा या काळात होणा-या रबीच्या पेरण्यांवर थेट परिणाम होतो.