छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बहुरंगी निवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी मैदानातून माघार घेतली. छाननीअंती ४४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप केल्यानंतर निवडणूक मैदानात ‘नोटा’सह ३८ उमेदवार रिंगणात असतील, असे नमूद केले.
पत्रकारांशी बोलताना स्वामी यांनी सांगितले, उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार असून, प्रशासनाने तयारी केली आहे. दुपारी २:४५ वाजता शेवटचा उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आला. जबरदस्तीचा प्रकार कुठेही घडला नाही. स्वत: उमेदवार माघार घेण्यासाठी आले होते.
राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे राखीव असलेले चिन्ह त्यांना देण्यात आले. नोंदणीकृत पक्षांना त्यांचे चिन्ह दिले. काही उमेदवारांना सोडत काढून चिन्ह देण्यात आले. दरम्यान, ‘नोट’सह ३८ उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. शिंदेसेना, उद्धवसेना आणि एमआयएम प्रामुख्याने हीच लढत असणार आहे. २०१९च्या निवडणुकीत ‘नोट’सह २४ उमेदवार मैदानात होते.
दररोज १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत जावे लागणार
११ मेरोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार तोफा थंडावतील. ३० एप्रिलपासून १२ दिवस प्रचारासाठी उरले आहेत. मैदानात असलेल्या उमेदवारांना रोज किमान १ लाख ७० हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागेल.
कोणत्या चिन्हासाठी लागली स्पर्धा
अॉटो रिक्षा, कपाट, रोड रोलर या चिन्हांसाठी सर्वाधिक मागणी होती. सोडतीला लहानगा न भेटल्यामुळे मीच डोळे बंद करून चिन्हाची चिठ्ठी काढली. तुतारी हे चिन्ह देखील उमेदवाराला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी नमूद केले.
निकाल उशिरा लागणार
१३ मेरोजी मतदान झाल्यानंतर ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. उमेदवार जास्त असल्यामुळे ३८ वेळा बॅलेट युनिटचा बझर वाजेल. फे-यांची संख्या वाढेल. मॉकपोल ३८ वेळा करावे लागेल, असे स्वामी म्हणाले.
बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात
२९ रोजी सायंकाळी सात वाजेनंतर बॅलेट पेपरच्या छपाईला सुरुवात केली. लष्करातील सैनिकांसह हर्सूल कारागृहातील आरोपी, घरून मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचा-यांचे बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जाणार आहे.