40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीय५ किलो रेशनने देश आत्मनिर्भर होणार नाही

५ किलो रेशनने देश आत्मनिर्भर होणार नाही

प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

रायबरेली : सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यातच काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींनी आपल्या भावासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमधील राहुल गांधीच्या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर जोरदार टीका केली.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘’देश ५ किलो रेशन देऊन आत्मनिर्भर होणार नाही तर रोजगार मिळाल्यानेच आत्मनिर्भर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न नागरिकांना दाखवत आहे. पण सध्याचा सत्ताधारी पक्ष ‘आत्मनिर्भर’ नव्हे तर परावलंबी धोरणे आखत आहे. अशा पक्षाची भूमिका आपल्या सर्वांना समजायला हवी.

सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठी काय पाऊले उचलली पाहिजेत तसेच शेतक-यांच्या  प्रश्नावर बोलले पाहिजे. सामान्य नागरिक आता मोदी सरकारला वैतागला आहे. तसेच सरकारने राजकारणावर चर्चा न करता नागरिकांच्या समस्या काय आहेत यावर चर्चा केली पाहिजे. राहुल गांधीनी रायबरेली मतदारसंघातून आपल्या खासदारकीचा अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींच्या ‘डरो मत’ घोषणेच्या भूमिकेवर भाजपातील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राहुल गांधी स्वत: घाबरत असल्यानेच रायबरेलीतून अर्ज दाखल केला आहे. अस त्यांच म्हणण होत. त्यानंतर आता या टीकेला प्रियंका गांधीनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधीच्या विरोधात भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह आहेत. त्यामुळे आता रायबरेली मतदरासंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता दोन्ही पक्षांना लागली आहे. ती आता येत्या ४ जूनला निकालानंतर संपेल. येत्या २० मे ला रायबरेली मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR