रांची : वृत्तसंस्था
रांची येथील विमानतळावर सोमवारी एक मोठा अपघात होता होता टळला. येथे पाटण्याहून १७५ प्रवाशांना घेऊन येणारे विमान लँडिंग करण्यापूर्वीच एका गिधाडाला धडकले. यानंतर, विमान ४० मिनिटे हवेतच ठेवण्यात आले. यानंतर, पायलटने सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर १७५ प्रवाशांना घेऊन येणा-या इंडिगो विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून केवळ विमानाचेच (एयरबस ३२०) नुकसान झाले आहे. विमानतळ संचालक आर. आर. मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांचीजवळ इंडिगोच्या विमानाची एका पक्ष्याला धडक बसली. घटनेच्या वेळी, विमान १०-१२ नॉटिकल मैल अंतरावर अर्थात ३०००-४००० फूट उंचीवर होते.
अधिका-याने म्हटले आहे की, या विमानाने १७५ प्रवाशांना घेऊन पाटण्याहून उड्डाण केले होते. लँडिंगपूर्वी, जवळपास ४ हजार फूट ऊंचावर उडणारे एक गिधाड विमानाला धडकले. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. आणखी एका सूत्राने म्हटले आहे की, गिधाडाच्या धडकेदरम्यान पायलटने समजदारी दाखवत विमान ४० मिनिटांपर्यंत सुरक्षितपणे हवेत ठेवले.