27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा

विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा

हिवाळी अधिवेशनात धक्कादायक माहिती समोर

नागपूर : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमाने जात असतात. विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून जो लाडू मिळतो, त्याचेही भाविक मनोभावे ग्रहण करतात. काहीजण तर तो प्रसाद घरीही घेऊन जातात. मात्र आता याच प्रासदाच्या लाडूबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.

प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाचा असून तो ज्या कारखान्यात तयार केला जातो, तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे. या अहवालाने विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सादर झाला.

या अहवालामध्ये प्रसाद म्हणून देण्यात येणा-या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडू बनवण्याचे काम बचत गट जेथे करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच २०२०-२१ मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचे कंत्राट दिले होते, त्या संस्थेला लाडू बनवण्यासंदर्भात निकष लावण्यात आले होते. पण प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली. लाडूच्या पाकिटावर जे घटक नोंदवले जातात, प्रत्यक्षात ते वापरलेच जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट असल्याचे कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून जे लाडू विकले जातात, त्यांच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो, असा इशारा अहवालात देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR