सोलापूर – ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिरातील अन्नछत्रमध्ये एक लाखाहून अधिक कडक भाकऱ्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. धान्यांचा साठाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
भाजीपाला मात्र रोज अथवा दिवसाआड मागवण्यात येणार आहे. यात्रा काळात अन्नछत्र सकाळी १० वाजल्यापासून यात्रेकरूंसाठी दिवसभर सुरू राहणार आहे. यात्रा कालावधीत संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी वाढपीची भूमिका बजावणार आहेत, असे यात्रा समिती दासोह विभागाचे सिध्देश्वर बमणी यांनी सांगितले. दासोहमध्ये २५ – कर्मचारी असून, त्यात निम्म्या महिला आहेत. किचन रूममध्ये १२ महिला स्वयंपाक बनवण्यासाठी आपली सेवा देत आहेत. यात्रेत भाविकांना प्रसाद मिळावा म्हणून जगदीश बिराजदार, सुरेश बळुरगी, शिवानंद पाटील आदी नियोजन करीत आहेत.
सध्या मंदिराच्या दासोहमध्ये दररोज २००० ते ३००० भाविक प्रसाद घेत आहेत. यात्रेत हा आकडा १० हजारांच्या घरात जातो. यात्रेतील विधीवेळी ही संख्या लक्षणीय असते. येत्या गुरुवारपासून पाच दिवस कृषी प्रदर्शन असून, त्यावेळी येणाऱ्या शेतकऱ्यांना दासोहमधील प्रसादाचा आस्वाद घेता येणार आहे.यात्रेतील एका दिवशी हुगी देण्यात येणार आहे. या गोड पदार्थाबरोबर शिराही भाविकांना मिळणार आहे. कर्नाटकी भात आणि सारही देण्यात येणार आहे.यात्रेतील तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळ्यापासून ते जानेवारी अखेरपर्यंत गहू ३० पोते, तांदूळ ३० पोते, हरभरा डाळ ६ पोते, तूर डाळ १० पोते, मूग डाळ १० पोते, शेंगदाणा तेल २०० किलो, दररोज पालक आणि चुका १०० पेंढ्या, एकदिवसआड १०० किलो वांगी आणि इतर गरजेनुसार भाजीपाला मागवावा लागतो.
गेल्या अनेक वर्षापासून पंच कमिटी दासोहची संकल्पना यशस्वीपणे राबवीत आहे. दर्शन घेतल्यावर भाविक जेव्हा प्रसाद घेतात तेव्हा ते धन्य होतात तेव्हा आमचाही आनंद ओसंडून वाहतो. यात्रेसाठी दासोहमध्ये चोख नियोजन केले आहे असे सिध्देश्वर यात्रा समितीचे सिध्देश्वर बमणी यांनी सांगीतले.