कराड – राज्यात घडलेल्या नरबळींच्या घटनांबाबत माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.
नरबळीविरोधी कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ तयार करावेत, अशी सूचना आ. चव्हाण यांनी राज्य सरकारला केली.
अंधश्रद्धेतून गडचिरोली जिल्ह्यातील हुंडापुरी (ता. भामरागड) येथे ६० वर्षे वयाचा तांत्रिक, त्याची पत्नी आणि त्याची दहा वर्षांची नात, असा तिहेरी खून ६ डिसेंबर रोजी करण्यात आला. तो मांत्रिक लोकांना वेगळ्या प्रकारची औषधे देत होता; परंतु या औषधांचा लोकांना फायदा होण्याऐवजी त्रास होत होता. त्यामुळे गावातील लोकांनी तिघांचा निर्घृण खून केला, अशी माहिती विधानसभेत देऊन, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.