पुणे : आधुनिक काळात दोन ते पाच वर्षांमध्ये ज्ञान बदलत असून, त्यात भरपूर वाढ होत आहे. त्यामुळे आपण पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जन करायला हवे. त्यातूनच नवसर्जनशीलता निर्माण होणार आहे. अशा पद्धतीने ज्ञानार्जन न करणा-या व्यक्ती आऊट ऑफ डेट होतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. माशेलकर म्हणाले की, वाचायला लागल्यावर, तुमचा शब्दसंग्रह उत्तम होतो.
याचा फायदा तुम्हाला लिहायला आणि वक्तृत्वाच्या दृष्टीने उत्तम होतो. त्यामुळे आपण वाचन करायला हवे. एखादी गोष्ट प्रभावीपणे कमी वाक्यात मांडायची असल्यास, तुमच्याकडे प्रभावी शब्दसंग्रह हवा. त्यासाठी पुस्तके वाचनासाठी वेळ काढायला हवा. रहस्यकथा आवडतात. त्याचप्रमाणे आत्मचरित्रावरील पुस्तके वाचायला आवडतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर अशा व्यक्तिमत्त्वाची पुस्तके खूप भावली, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.