पुर्णा : येथील महावितरणाच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालय तसेच तहसील कार्यालयात दि. २१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिका-यांनी कर्मचारी संदर्भात चौकशी केली असता दोन्ही कार्यालयामध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. याबद्दल मनसे पदाधिका-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या कर्मचा-यांवर वरीष्ठ अधिका-यांचा वचक राहीला नसून त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मनसे पदाधिका-यांनी केली आहे.
शासनाने ५ दिवसाचा आठवडा केला आहे तरी सुद्धा कर्मचारी कामासंबंधी निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत. सतत गैरहजर राहत असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. कर्मचारी कधीही आपल्या मर्जीने कार्यालयात येतात व जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत. चकरा मारूनही काम होत नसल्याने नागरीकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. या कर्मचा-यांवर जिल्हाधिकारी यांनी शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच कामचुकार कर्मचा-यांची पगार रद्द करण्यासाठी बायोमेट्रिक बसवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी माध्यमाशी बोलताना केली आहे.
महावितरण, तहसील कार्यालयाची पाहणी करण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, तालुका अध्यक्ष अनिल बुचाले, शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर शहर सरचिटणीस ओम यादव, उपशहर अध्यक्ष पंकज राठोड, उपशहर अध्यक्ष, अविनाश मैत्रे, शशिकांत सूर्यवंशी, पवन बोबडे, भारत बोबडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.