नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे पार पडलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांविरोधात अश्लील आणि अक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या तरुण आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफ केले आहे. शुक्रवारी उशिरा रात्री प्रसिद्ध केलेल्या एका विशेष व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी भावनिक साद घालत लहानपणात चुका होतात आणि चुकांमधून शिकण्याची संधीही असते असे प्रतिपादन केले. कायदेशीर कारवाया, न्यायालयाच्या फेऱ्या किंवा सामाजिक दडपणाने परिस्थिती सुधारणार नाही, तर या भरकटलेल्या तरुणांना आपलंसं करून योग्य मार्ग दाखवणे हे समाजाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जंतर-मंतरवर घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, काही खोडकर मुलांनी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली आणि कोणत्याही सभ्य समाजाला न शोभणारे शब्द वापरले गेले. मला तर शिव्या दिल्याच, पण माझ्या स्वर्गीय आईलाही सोडले नाही, हे अत्यंत दुःखद होते. मात्र लहानपण हे चुकांचे आणि त्यातून शिकण्याचे वय असल्याने मी त्यांना मनापासून माफ करत आहे. आपल्या घरातील मुला-मुलींनी अशा प्रकारची भाषा वापरणे हा एक मोठा सांस्कृतिक धक्का आहे, असे सांगतानाच पंतप्रधानांनी समाजाला शांत राहण्याचे आणि या तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचे आवाहन केले.
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना पंतप्रधानांनी एक व्यावहारिक दाखला दिला. जेवताना कधी-कधी स्वतःच्याच दातांखाली आपली जीभ येते आणि रक्त येते, पण म्हणून आपण दात तोडून टाकत नाही. कारण दातही आपलेच असतात आणि जीभही आपलीच असते. ही मुलेदेखील आपलीच आहेत आणि त्यांना शिक्षा देऊन न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावण्यापेक्षा योग्य रस्ता दाखवणे हे कठीण असले तरी आपलेच काम आहे.
पंतप्रधानांनी आंदोलक तरुणांना थेट उद्देशून एकत्र येण्याचे आवाहन केले. देशासाठी एकत्र मिळून पुढे जाऊया, चुकांमधून शिकूया आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करूया, असा संदेश त्यांनी दिला. देश वेगाने पुढे जात आहे आणि तुमच्या भविष्यासाठीच मी अहोरात्र कष्ट करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेपरफुटी व शैक्षणिक मुद्द्यांवरून जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये पंतप्रधान मोदी व त्यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल अनुचित शब्द वापरल्याचे दिसून आले होते, ज्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एफआयआर नोंदवून कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र, पंतप्रधान मोदींच्या या व्हिडिओ संदेशानंतर या प्रकरणाला अत्यंत वेगळे आणि सकारात्मक वळण मिळाले आहे.
















