पुणे : प्रतिनिधी
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी पुणे महापालिकेचे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याने शहरातील विकासकामांच्या गतीवर परिणाम झाल्याची स्पष्ट कबुली महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. महापालिकेचे जवळपास ८० टक्के मनुष्यबळ एसआयआरच्या कामात गुंतल्याने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम तसेच नागरिकांच्या दैनंदिन तक्रारींच्या निवारणालाही फटका बसल्याचे त्यांनी मान्य केले.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार निश्चित कालमर्यादेत ‘एसआयआर’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त नवल किशोर राम व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यापूर्वी दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचे ८० टक्के मनुष्यबळ या कामासाठी देण्यात आले आहे. परिणामी पथ, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम आणि इतर विभागांतील नियमित कामांवर त्याचा थेट परिणाम झाला. अनेक अधिकारी क्षेत्रीय पाहणीऐवजी एसआयआरच्या कामात व्यस्त असल्याने विकासकामांचा वेग कमी झाला आहे.
महापालिकेने गेल्या काही महिन्यांत विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या असल्या, तरी मनुष्यबळाअभावी याची अंमलबजावणी अपेक्षित वेगाने झालेली नाही. त्यामागे मनुष्यबळाची कमतरता आणि एसआयआरमधील व्यस्तता ही दोन प्रमुख कारणे असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मान्य केले आहे. प्रशासनाने आता एसआयआरचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांना पुन्हा विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
















