विविध क्षेत्रांतील ८९ मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान, उपक्रमाचे ८ वे वर्ष
लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्याच्या मातीतील जनसामान्यांच्या आवाज बनून लोकांच्या न्याय-हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पुरोगामी विचाराचे एकमतचा आज ३५ वर्धापनदिन सोहळा पार पडला. या निमित्त लातूर येथील मार्केट यार्ड भागातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळा जल्लोषात पार पडला. या सन्मान सोहळ््यात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या मान्यवरांचा पाहुण्यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मानाने गौरव करण्यात आला. यावेळी एकमतवर अलोट प्रेम करणा-या वाचक, एजंट, जाहिरातदार, हितचिंतक, मार्गदर्शकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकमतच्या मार्गदर्शक तथा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर, ज्येष्ठ साहित्यिक योगिराज माने, कला दिग्दर्शक सतीश पांचाळ, डॉ. सारिका देशमुख, श्रीमती संगीता मोळवणे, शिक्षणाधिकारी प्रमोद पवार, तालमणी राम बोरगावकर, द्वारकानाथ श्यामकुमारचे तुकाराम पाटील, दिलीप माने, अॅड. जगन्नाथ चिताडे, प्रभाकर सुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय, व्यावसायिक, उद्योग, प्रशासन, सांस्कृतिक कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक, बांधकाम, महिला सक्षमीकरण, कृषी, शैक्षणिक, ग्रामविकास, सहकार आदी क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून नावलौकिक मिळविलेल्या जिल्ह्यातील ८९ मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक करण्यासाठी एकमतच्या वतीने कृतज्ञता सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकमतच्या वर्धापनदिनी दरवर्षी हा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित केला जातो. या कृतज्ञता सन्मान सोहळ््याचे हे आठवे वर्ष आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एकमतचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांनी सामाजिक बांधिलकीचा विचार करून आपल्या मातीत जन्मलेल्या लोकांच्या न्याय-हक्कासाठी एकमतची मुहूर्तमेढ रोवली आणि तोच उद्देश डोळ््यासमोर ठेवून गेल्या ३५ वर्षांपासून एकमतची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर एकमतने काळानुसार बदल स्वीकारत लोकल टू ग्लोबलपर्यंत झेप घेतली. प्रिंट मीडियासोबत डिजिटल एकमत सुरू केले आणि आता युट्यूबच्या माध्यमातून एकमत वैश्विक पातळीवर पोहोचला असून, रोज लाखो लोक ऑनलाईन एकमत वाचतात. हे एकमतचे मोठे यश आहे, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रमोद पवार, ज्येष्ठ साहित्यिक योगिराज माने, कला दिग्दर्शक सतीश पांचाळ, डॉ. सारिका देशमुख, श्रीमती संगीता मोळवणे आदींनी मनोगत व्यक्त करताना एकमतवर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. योगीराज माने यांनी एकमतचे संस्थापक लोकनेते विलासराव देशमुख यांच्यावर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कविता आणि अभंग ऐकताना साहेबांच्या आठवणींनी श्रीमती वैशालीताई देशमुख यांना अश्रू अनावर झाले.
शेवटी अध्यक्षीय समारोपात श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी एकमतने ३५ वर्षे पूर्ण केल्याचा अभिमान वाटतो, असे म्हटले आणि जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच एकमतची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यात सर्व कर्मचा-यांचेही योगदान मोठे आहे. यापुढेही एकमतवर असेच जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद कायम राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ््यात उत्कृष्ट व्यवसाय करणारे एकमतचे नांदेड आवृत्तीचे प्रमुख चारुदत्त चौधरी, निलंगा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील आणि शिरुर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी शकिल देशमुख यांचा एकमतच्या मार्गदर्शक श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी एजाज शेख आणि उपसंपादक शाहिदा पठाण यांनी केले. शेवटी आभार एजाज शेख यांनी मानले. यावेळी यूट्यूबच्या टीमनेही सर्व कृतज्ञता सन्मानार्थींच्या लाईव्ह मुलाखती दाखवून या सोहळ््याची शोभा वाढविली. या कामी सुनीलकुमार कांबळे आणि नितीन बनसोडे यांच्यासह त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
एकमतवर शुभेच्छांचा वर्षाव
एकमतच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, दि. २० ऑगस्ट रोजी झालेल्या स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळ््यात एकमतवर भरभरून प्रेम करणारे मान्यवर, वाचक, एजंट, जाहिरातदार, हितचिंतक, मार्गदर्शक आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावून आणि कार्यक्रमानंतर उपस्थित राहून एकमतवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
















