नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे, तर दक्षिण भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात दक्षिण कोकणात आज आणि उद्या तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिणेकडील राज्यामध्ये पुढील ४८ तास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ९ जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले.
पंजाब आणि दिल्लीच्या एकाकी भागात खूप दाट धुके दिसले. दिल्लीच्या काही भागांना दाट धुक्याने वेढले आहे, असे आयएमडीने म्हटले आहे.
येलो अलर्टचा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम देशभरातील हवामानावरही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटक राज्याच्या किनारी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला.