पुणे : राज्यात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत राज्यात तब्बल ४७ लाख ३७ हजार ७६३ नागरिकांना कुर्त्यांनी चावा झाला आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ५ लाख २९ हजार ६५० जणांना चावा घेतला. याशिवाय मांजर आणि माकडांच्या हल्ल्यांमुळेही नागरिक जखमी होत असून, गेल्या पाच वर्षांत या तीन प्राण्यांच्या चाव्यामुळे राज्यात १३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्देश दिले आहेत. यामध्ये श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि जंतनाशक उपचार करणे तसेच रेबीजग्रस्त किंवा आक्रमक श्वानांना पुन्हा रस्त्यावर सोडू नये. शाळा, रुग्णालये, यांसारख्या संवेदनशील ठिकाणांवरील भटके श्वान हटवून त्यांना निवारा केंद्रात ठेवावे. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कार्यरत एबीसी केंद्र असावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
प्राण्यांच्या चाव्यामुळे जखमी नागरिक
श्वान : ४७,३७,७६३
मांजर : ४,६६,३९२
माकड : ४३,९५५
टॉप पाच जिल्हे
मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे
अवमान याचिका करणार
या समस्येची तीव्रता शासनाच्या निदर्शनास यावी, यासाठी माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी मिळविली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही, तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर दरवडे यांनी सांगितले.
















