अहमदनगर : येथील जिल्हा परिषदेचा परिसर अंगणवाडी कर्मचा-यांच्या (सोमवारी) शिट्ट्यांनी घुमला. विविध मागण्यांसाठी त्यांनी धरणे आंदोलन केले. त्यावेळी सरकारी यंत्रणेला जाग आणण्यासाठी शिट्ट्या वाजवल्या.
अंगणवाडी कर्मचा-यांनी राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचा-यांना सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या बेकायदेशीर नोटिसा रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी आदी प्रलंबीत प्रश्नांकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी सरकारला जागे करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निषेध नोंदविला. संपाचा ३५वा दिवस उजाडून देखील मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अंगणवाडी कर्मचा-यांनी जोरदार निदर्शने केली. मानधन नको वेतन हवे, वेठबिगारी नको जगण्याचा हक्क हवा… या घोषणांनी परिसर दणाणला.