नवी दिल्ली : बिहारमध्ये मोठा राजकीय गदारोळ सुरु आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बिहार सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे. केवळ दिल्लीतच नाहीतर बिहारमध्येदेखील बैठकांवर बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आमदारदेखील सहभागी होणार आहेत. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचा विचार केला तर तिथेही बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
बिहारमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती वृत्तसंस्थेला सूत्रांकडून मिळाली आहे. जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुनरागमन करण्याच्या चर्चादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत दिसले. तसेच राजकीय गोंधळादरम्यान, बिहार सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील २२, भारतीय पोलिस सेवेतील ७९ आणि बिहार प्रशासकीय सेवेतील ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
भाजपच्या जवळचे आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे सुपुत्र संतोष कुमार सुमन यांनी सांगितले की, बिहार सरकार एक ते दोन दिवसांमध्ये कोसळू शकते. राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात राहणार नाही. नितीश कुमारांचे घराणेशाहीवरचे विधान काँग्रेस आणि राजद यांना उद्देशून होते, असाही दावा त्यांनी केला.