नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट हे कायम चर्चेत असते. मात्र त्यांच्याभोवतीची चर्चा कायमच वादग्रस्त असते. आता देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आले आहे. त्यांनी नुकतेच तीन महिला क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे. कारण काय तर या तीन महिला क्रिकेटपटूंमधील कॅटफाईट!
पीसीबीने नुकतेच सदाफ शम्स, युसरा आणि आयेशा बिलाल या क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे. या महिला क्रिकेटपटू राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यातील एका महिला क्रिकेटपटूच्या नाकातून रक्त देखील येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार सदाफ शम्स आणि युसरा यांनी त्यांचीच संघसहकारी आयेशा बिलालवर हल्ला चढवला. ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पीसीबीकडे एक अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. पीसीबीने या तीनही क्रिकेटपटूंवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यांना पुढची नोटीस मिळेपर्यंत खेळण्यापासून देखील रोखण्यात आले आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेटच्या प्रमुख तानिया मलिक या प्रकरणी लवकरच चौकशी सुरू करणार आहेत. राष्ट्रीय महिला क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये सहा विभागाचे संघ खेळतात. यात कराची, लाहोर, पेशावर, क्वेट्टा आणि रावळपिंडी या संघांचा समावेश आहे.