नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच हॉकी ५ एस महिला वर्ल्डकप
स्पर्धेची फायनल गाठली आहे. भारताने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ६-३ असा पराभव केला.
भारताकडून अक्षता ढेकालेने सातव्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला. त्यानंतर मारिआना कुजूरने ११ व्या मिनिटाला, मुमताज खानने २१ व्या, ऋतुजा पिसाळने २३ व्या, ज्योती छेत्रीने २५ व्या तर अजिमा कुजूरने २६व्या मिनिटाला गोल केले.
दक्षिण आफ्रिकेकडून टेशवान दे ला रेने पाचव्या मिनिटाला गोल करत आफ्रिकेचे खाते उघडले होते. त्यानंतर कर्णधार टोनी मार्कने आठव्या आणि कॅमबेरलैनने २९ व्या मिनिटाला तिसरा गोल केला. आफ्रिकेने सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी पहिल्या हाफमध्ये आधी गोल करत आघाडी घेतली होती. मात्र भारताने दक्षिण आफ्रिकेची ही आघाडी त्वरित बरोबरीत बदलली. मात्र टोनी मार्कने पुन्हा आफ्रिकेला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मारिआना कुजूरने त्वरित २-२ अशी बरोबरीत बदलली.
दुस-या हाफमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात केली. त्यांनी भारताची गोलकिपर रजनीची परीक्षा पाहिली. मात्र भारताने आपला भक्कम बचाव केला. त्यानंतर ऋतुजाने मुमताजच्या साथीने भारताला आघाडी मिळवून देण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताची आघाडी वाढवली.
दक्षिण आफ्रिका देखील गोलची परतफेड करण्यासाठी काऊंटर अटॅक करत होता. मात्र ज्योतीने दबावात चांगला खेळ करत भारताला ५-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अजिमाने ही आघाडी ६-२ अशी केली. अखेर आफ्रिकेकडून कॅमबेरलैनने शेवटचा गोल केला. मात्र हा गोल भारताचा विजय रोखू शकला नाही. आता फायनलमध्ये भारतीय संघ रविवारी नेदरलँड्ससोबत भिडणार आहे.