नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी राबवण्यात येणा-या योजनांची माहिती दिली.
अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कृषी क्षेत्राला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेती क्षेत्रामध्ये ५५ लाख नवीन रोजगार निर्माण केले जाणार आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून ३८ लाख शेतक-यांना लाभ झाला आहे आणि १० लाख रोजगारनिर्मिती झाली.
पुढे बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, शेतक-यांची पीक कापणी झाल्यानंतर होणारे नुकसान टाळणे गरजेचे आहे. पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योजनांवरही काम केले जात आहे. त्यासाठी आम्ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करत आहोत. त्यासाठी तेलबिया उत्पादनाच्या अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गतच नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार आहे.
याशिवाय दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतक-यांनाही मदत केली जाईल. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जात आहेत. सरकारकडून मत्स्य संपत्तीही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीफूड उत्पादन दुप्पट झाले असून मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता तीन ते पाच टन प्रति हेक्टर वाढवली जाईल. त्यामुळे ५५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे अर्थमंत्री म्हणाल्या.