परभणी : शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौक ते जिल्हा शासकीय रूग्णालय रस्त्यावर मागील ६ महिन्यांपासून मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. परंतू हा निर्णय परीसरातील व्यापारी व नागरीकांसाठी अतिशय गैरसोयीचा ठरत आहे. तसेच एकेरी वाहतुकीमुळे व्यापा-यांना व्यावसायिक दृष्टीने फटका बसत आहे. यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून सदरील रस्त्यावरील एकेरी वाहतूक रद्द करून पुर्वीप्रमाणे वाहतूक व्यवस्था अंमलात आणावी अशी मागणी आ. डॉ. राहूल पाटील यांच्या नेतृत्वात परीसरातील व्यापारी, नागरीकांच्या वतीने पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील शिवाजी चौक ते जिल्हा शासकीय रूग्णालय पर्यंत मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतू यामुळे परीसरातील गल्लयांमध्ये वाहतुकीच कोंडी निर्माण होत असून लहान मुलांच्या स्कुल बस व अन्य वाहनांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाहतुकीची वर्दळ वाढल्याने अपघाताच्या छोट्या मोठ्या अनेक घटना रोज घडत आहेत. एकेरी वाहतूक व्यापा-यांना देखील व्यावसायिक दृष्टीकोनातून मारक ठरत असून याचा व्यापारावर परिणाम झाला आहे.
त्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर मनपाला अनेकवेळा निवेदने देण्यात आली परंतू याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. एकेरी वाहतुकीच्या पर्यायाचा पुनर्विचार न झाल्यास परीसरातील व्यापा-यांच्या व्यवसायावर परिणाम होवून या ठिकाणी काम करणा-या हजारो व्यक्तींवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे एकेरी वाहतुकीचा पर्यांय रद्द करून पुर्वीप्रमाणे वाहतूक व्यवस्था अंमलात आणावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांनी या मागणीला सकारात्मक प्रतीसाद दिला असून लवकरच पुर्वीप्रमाणे वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
या वेळी घनशाम मालपाणी, संतोष धारासूरकर, अनिल डहाळे, परीक्षीत वट्टमवार, सौ. अंबिका डहाळे, नवनीत पाचपोर, उदय समेळ, विजय जाधव, नितीन मुथा, लालचंद जैन, सचिन मुत्तेपवार, सुर्यकांत कोकड, विशू डहाळे, सौरभ पारशेवार, भारत जाधव, जगदीश शर्मा, प्रसाद चेऊलवार, श्रीकांत मालपाणी, प्रतीक वट्टमवार, राजेंद्र पुरजळकर, विजय उपाध्याय, राहूल जैन, शैलेश जैन, प्रशांत पत्तेवार, सुनील जैन, विठ्ठल बहीवाल, मंदा दहीवाळ, नम्रता शर्मा आदी व्यापा-यासह नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत.