28.4 C
Latur
Thursday, February 6, 2025
Homeमुख्य बातम्यासंख्याबळाच्या अभावामुळे राज्यसभा निवडणूक लढवणार नाही : पवार

संख्याबळाच्या अभावामुळे राज्यसभा निवडणूक लढवणार नाही : पवार

पुणे : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. येत्या २८ फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अशात या निवडणुकीत राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याची चर्चा होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे राज्यसभेची जागा लढवण्यासाठी संख्याबळ नाही. बहुमत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, असे शरद पवार म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे भाजप ३, शिवसेना शिंदे गट १, राष्ट्रवादी अजित पवार गट १ आणि काँग्रेस १ असे सहा उमेदवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.

मविआचे जागावाटप १० तारखेपर्यंत
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. यावर शरद पवारांनी भाष्य केले आहे. मविआचे जागा वाटप कधी होणार हे देखील शरद पवारांनी सांगितले आहे. जागावाटप चर्चा चांगली झाली. जागा जिंकणे महत्वाचे असले तरी ती जागा कशासाठी जिंकतोय हे महत्वाचे असते. ९ ते १० फेब्रुवारीपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल, असे शरद पवार म्हणाले.

नितीश कुमार का बदलले माहित नाही?
इंडिया आघाडीत फुटीवर भाष्य करताना शरद पवारांनी म्हटले, निवडणूक होऊ द्याव्यात. नंतर एकत्रित बसू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. नितीशकुमार यांची भूमिका अशी का बदलली सांगू शकत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप विरोधी भूमिका घेतली होती. पण आता त्यांची भूमिका का बदलली हे माहित नाही, असे शरद पवार म्हणाले.

पवारांचा नरेंद्र मोदी यांना टोला
सत्तेचा गैरवापर होतो त्याला पर्याय राहिलेला नाही. शेवटी सामान्य जनतेसमोर जावे लागेल. सोरेन आदिवासी नेता आहेत. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. जसे गुजरातला सगळं देण्यासाठी ते धैर्य दाखवत असतात. तसं महाराष्ट्र राज्याला पण द्यावं, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR