सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास देशात निवडणुका होणारच नाहीत, असा विरोधकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुळात विरोधकांमध्येच एकवाक्यता नसल्याचे सांगून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आसरा चौकाजवळील जुळे सोलापूर भागातील जामगुंडी मंगल कार्यालय येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (ग्रामीण) कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजयमामा शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, कल्याणराव काळे, उत्तम जानकर, विक्रांत पाटील, उमेश पाटील, अजिंक्यराणा पाटील, सुवर्णा झाडे, शिवराम जाधव, राजेंद्र हजारे, अभिषेक आव्हाड, बाळू बंडगर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केले.
यावेळी अजित पवार म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्या आहेत. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे त्या कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा ताण उजनी धरणावर आला आहे. उजनीमुळे माढा, करमाळा, इंदापूर, दौंड आदी तालुक्यातील चित्र बदलले आहे. सांगोल्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता मोहोळचा विषयही संपवायचा आहे. मोहोळ तालुक्यात पाचशे कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. संजयमामा आणि बबनदादा यांनाही जास्तीत जास्त निधी देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येत्या बजेटपर्यंत सर्व निधी वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली.