पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाकडून विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला असून, याच मेळाव्यात बोलताना रोहित पवारांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘ईडीने मला जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझं कुटुंब येथून लढेल’, असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू असून, याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मंगळवारी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत आलेल्या निर्णयानंतर शरद पवार गटाचा पहिला मेळावा आज अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान याच मेळाव्यात बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘‘काल घेतलेला निर्णय संविधानाच्या बाजूने नव्हता. गेल्या काही वर्षांत संविधान बाजूला ठेवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.
२०१४ ते आतापर्यंत संविधानाला तडा आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. दबाव टाकून सर्वच खासदार जर भाजपने स्वत:च्या बाजूने केले, तर भविष्यात निवडणुका होतील की नाही याची शंका आहे. २०२४ मध्ये भाजपची सत्ता आली तर पुढच्या निवडणुका लागतील याबाबत देखील शंका आहे. भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना लोकसभेनंतर स्वत:च्या चिन्हावर नाही, तर भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल. तसेच जयंत पाटलांवर ईडीचा दबाव टाकला जातोय, पण ते लढत असल्याचे, देखील रोहित पवार म्हणाले.
घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा एक सेल झाला आहे. शरद पवार गटाचे नाव आज संध्याकाळी कळेल, चिन्ह आज मिळेल की नाही माहिती नाही. पण जे चिन्ह मिळेल ते सर्वसामान्यांच्या मनातील चिन्ह असेल. घड्याळ आपल्याकडे नसलं तरी वेळ आपलीच आहे. तसेच, नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करताना राष्ट्रवादीचा पंचा देता येणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.