बीड : भारतीय जनता पक्षाकडून सध्या गाव चलो अभियान सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या अभियानात सहभागी झाल्या असून त्यांनी बीड शहराजवळ असलेल्या नारायण गडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतले आणि तिथून पोंडूळ या गावी लोकांशी संवाद साधून मुक्काम केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.
मात्र त्यांच्या एका विधानामुळे मोठी चर्चा रंगली आहे. ‘ मला मतदारसंघ राहिलेला नाही ‘ असे विधान करत पंकजा मुंडे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
पोंडूळ येथे ग्रामस्थांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मन की बात लोकांच्या समोर ठेवली. मागच्या पाच वर्षांमध्ये कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते आणि ती होणं स्वाभाविक आहे कारण लोकांना आणि मीडियाला असे वाटते की मला एखादी उमेदवारी मिळावी. तशीच आता सुद्धा चर्चा होते असे मत पंकजा यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी एक मोठे विधानही केले. ‘आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला तसा मतदारसंघ राहिलेला नाही’ असे सांगत पंकजा मुंडे यांनी मला लोकसभेला जायला आवडेल का राज्यसभेला जायला आवडेल हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झालाय, असं म्हटले. मला कुठे जायला आवडेल यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचंय हे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भाजपच्या अभियानात सहभागी
भाजपच्या गाव चलो अभियान सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या अभियानाच्या निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी आहेत. त्यावेळी त्यांनी गावक-यांशी संवाद साधत मोठे वक्तव्य केले. ‘‘तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचे प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झाले आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.