मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा आणि विधीमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना दिलासा देत अशोक चव्हाणांसोबत कोणीही जाणार नाही असे स्पष्ट केले. दरम्यान उद्या (दि. १३ रोजी) कॉँग्रेसची बैठक बोलाविण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. पक्षाने त्यांना मोठमोठ्या पदावर संधी दिली होती. परंतु सध्या भाजपकडून ज्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे, त्यावरुन त्यांच्यावर कोणता दबाव होता का, हे स्पष्ट होईल.
चव्हाण पुढे म्हणाले, अशोक चव्हाण पक्ष सोडून गेलेले असले तरी त्यांच्यासोबत इतर आमदार, पदाधिकारी जाणार नाहीत. भाजपकडून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे उद्या आम्ही आमदारांची बैठक बोलावली असून सगळे मुंबईत येत आहेत. कुणी कुठेही गेलेले नाही.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांना कोणत्या कारणामुळे बाध्य केले गेले, हे समजत नाही. असे असले तरी काँग्रेस मजबुतीने भाजपचा सामना करणार आहे.