– अबू आझमींची मागणी
मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात याबाबतचे विधेयक सादर करणार आहेत. मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींनंतर राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी मुस्लिम समाजालाही आरक्षण द्या अशी मागणी केली आहे.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करण्यात आले. आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी फलक झळकावत मुस्लिम आरक्षणाची मागणी केली. नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. मराठा आरक्षण बिलाचे आम्ही स्वागतच करतो. मुस्लिम समाजालादेखील आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम समाजावर अन्याय होता कामा नये. मुस्लिम समाजात जे गरीब लोक आहेत त्यांना आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुस्लिम समाजाने आंदोलन केले तर त्यांना…
ते पुढे म्हणाले की, अनेक सरकारे आली मात्र मुस्लिम आरक्षणावर कोणीच बोलत नाहीत. मुस्लिम समाजाची यांना मतं हवी. पण, त्यांच्या आरक्षणावर कोणीच बोलत नाही. आज मराठा समाजाने आंदोलन केले म्हणून त्यांना न्याय मिळत आहे. जर मुस्लिम समाजाने असे केले तर त्यांना गोळ्या घातल्या जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.