देवणी : बाळू तिपराळे
हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी पिकांची सोंगणी करण्याची घाई करीत आहे. परंतु तालुक्यात मजूर मिळत नसल्याने ज्वारीचे पीक उभेच आहे. ज्वारीची सोंगनी कशी करायची? असा प्रश्न शेतक-यांना पडला असून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावला आहे.
यावर्षी गेल्या वर्षीच्या प्रमाणात पाऊस जरी कमी झाला असला तरी, मध्यंतरीच्या काळात अवकाळी पाऊस पडल्याने ब-याच शेतक-यांनी ज्वारीची पेरणी केली होती. पेरणी केल्यानंतर देखील अवकाळी पाऊस पडल्यामुळे ज्वारीचे पीक चांगले आले. सध्या ज्वारीचे पीक सोंगणीला आले आहे. परंतु मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यापूर्वी मजूर ज्वारीची गुत्ते घेत होते. पूर्वी एकरी सात पायल्या ज्वारी दिली जात असायची, परंतु अलीकडच्या काळात मजूर मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सध्या मजूरा आभावी ज्वारीचे पीक उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकरी दोन मन म्हणजे जवळपास दीड ते दोन क्विंटल मागणी केली जात आहे .त्यामुळे शेतक-यांना मजुराकडून सोंगनी करूनही पुरत नाही. त्यातच हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असून, बळीराजा चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील काही परिसरातील शेत जमिनीचा भाग हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जमीन ही काळी असल्यामुळे ज्वारीचे पीक चांगल्या प्रकारे येते. तर काही भागातील जमीन ही मध्यम प्रकारची असल्यामुळे या ठिकाणी खोंड किंवा हायब्रीड ज्वारी पेरली जात होती. परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये संशोधन झाल्यामुळे नवनवीन ज्वारीचे वान आले आहे. त्यामुळे या भागात देखील मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होत आहे. परंतु सध्या ज्वारीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी ही ज्वारी पेरण्यासाठी टाळाटाळ करतात.