परभणी / प्रतिनिधी
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतू राज्य सरकारने मराठा आणि ओबीसीचे ताट वेगवेगळेच केले पाहिजे असी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत स्पष्ठ केली.
परभणी शहरात ओबीसी भटक्या विमुक्तांची एल्गार महासभेसाठी सोमवार दि. २६ रोजी मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे परभणीत आले होते. सभेच्या आगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील मराठा आरक्षण आंदोलन आता उग्र रुप धारण करित आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकाने यावर विनाविलंब तोडगा काढला पाहिजे. मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते मुंबईला गेल्यानंतर हा प्रश्न मिटला असे वाटू लागले होते. परंतू, तो प्रश्न मिटला नाही.
उलट आता हा प्रश्न जास्त चिघळला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सामाजिक असंतोष चांगला नाही.यावर नियंत्रण आवश्यक आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावणे चांगले आहे. मराठा समाजाला आरक्षणाला आमचाविरोध नाही. परंतू मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठा आणि ओबीसींची ताटे वेगवेगळी असावी अशी आमची भूमिका आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनाची तिव्रता कमी झाली का ? यावर बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सहाजिकच आंदोलनावरून आरोप – प्रत्यारोप झाल्यानंतर आता लोकांमध्ये आंदोलनाची तिव्रता कमी झाल्याचे जाणवत आहे. परंतू कालच्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला लोकांचाही चांगला सपोर्ट दिसून आला असेही आंबेडकर म्हणाले.
मविआत जाण्याचे अजून ठरविले नाही
महाविकास आघाडीत जाण्याचा आमचा निर्णय अजून झालेला नाही. मविआचा लोकसभेच्या ३९ जागांचा फॉर्मुला ठरला असल्याचे समजले. आम्हाला त्या बैठकीचे आमंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांचे काय ठरले याची आम्हाला माहिती नाही. मात्र आमची लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवाराची यादी तयार झाली असून आम्ही ही सक्षम उमेदवार देणार आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.