नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या बकेल येथे हैदराबादच्या एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ३६ वर्षीय भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह रस्त्याशेजारी असलेल्या एका कचराकुंडीत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेच्या पतीवरच तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरु केला आहे.
मिळालेल्याा माहितीनुसार, महिलेचे नाव चैतन्य मधागानी असल्याची माहिती आहे. महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मुलासह हैरदराबादला आला. येथे त्याने मृत महिलेच्या आई-वडिलांकडे मुलाला दिले.
चैतन्य मधागानी ही पती आणि मुलासह ऑस्ट्रेलियात राहत होती. विक्टोरिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनचेल्सियाजवळ बकले येथे एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती. महिलेचा मृतदेह माऊंट पोलक रोड येथे आढळून आला होता. होमिसाइड स्क्वाडची डिटेक्टिव्ह टीम या घटनेचा तपास करत आहेत. महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचे अधिका-यांनी सांगितले. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी असलेले लोक हे एकमेकांना ओळखत असून गुन्हेगार देश सोडून पळाला आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबाची विनंती
या घटनेची माहिती मिळताच हैदराबाद येथील आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ही महिला त्यांच्या मतदारसंघातील असल्यामुळे त्यांनी तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. महिलेच्या आई-वडिलांच्या विनंतीनंतर त्यांनी महिलेचा मृतदेह हैदराबाद येथे आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयालाही याबाबत माहिती दिली आहे. आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जावयाने मुलीची हत्या केल्याचे कबुल केले आहे.