मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी विरोधात असलेला बचावात्मक पवित्रा बदलून टाकत थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
यानंतर आता वंचित आघाडीला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव देण्यात येणार नसून दिलेल्या प्रस्तावावर वंचित बहुजन आघाडीनेच निर्णय घ्यायचा आहे या मतापर्यंत महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली आहे. काल (१६ मार्च) शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कळीचा मुद्दा झालेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही? याची चर्चा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, तरी सुरूच आहे.
या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपावर खल करण्यात आला. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी १७ जागा मागितल्याने वंचितशिवाय बैठकीमध्ये विचार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या निवडणुकीमध्ये शरद पवार गट दहा ते बारा जागांवर निवडणूक लढवणार असून काँग्रेस १८ ते २० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा या शिवसेना ठाकरे गट आणि मित्र पक्ष राजू शेट्टी यांच्यासह दिल्या जाणार आहेत.