नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१) महासभा आयोजित केली आहे. या वेळी राष्ट्रवादी Ñकाँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. विविध राज्यांतील अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. ही कृती लोकशाहीवर हल्ला आहे आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी आपली आहे.’’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या, ‘‘तुमच्याच केजरीवाल यांनी तुरुंगातून तुमच्यासाठी संदेश पाठवला आहे. हा मेसेज वाचण्यापूर्वी मला तुम्हाला काही विचारायचे आहे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या पतीला तुरुंगात टाकले, पंतप्रधानांनी बरोबर केले का?
केजरीवालजी हे खरे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास आहे का? हे भाजपवाले म्हणतात की, केजरीवाल तुरुंगात आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा का? तुमचे केजरीवाल सिंह आहेत, त्यांना जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.