नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने(एआयए) महाराष्ट्रासह देशभरातील १५ ठिकाणी छापे टाकले आहे. परदेशात चांगल्या नोकरीच आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणा-यांची साखळी एनआयएने उद्धवस्थ केली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या अधिका-यांना या छाप्यांदरम्यान संशायस्पद कागदपत्रे मिळाली आहे. त्यात संगणकातील डाटा, वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट, डिजिटल डिव्हाईस, कर्मचा-यांचे नियुक्तीपत्र आदी गोष्टींचा समावेश आहे.
चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक होत असल्याची तक्रार एनआयएकडे आली. त्यानंतर एनआयने छापेमारी सुरु केली. वडोदरा येथील मनीष हिंगू, गोपालगंजचा पहलद सिंग, दक्षिण-पश्चिम दिल्लीचा नबियालम रे, गुरुग्रामचा बलवंत कटारिया आणि चंदीगडचा सरताज सिंग यांना अटक केली. एनआयएने महाराष्ट्र, यूपी, बिहार, गुजरात, दिल्ली, १५ ठिकाणी कारवाई करून आरोपींना अटक केली. एनआयएने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई केली. या प्रकरणात आठ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बनावट कॉल सेंटरमध्ये काम
भारतीय तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात नेले जात होते. त्यानंतर या तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोन (सेज) आणि कंबोडिया येथे बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. त्या ठिकाणांवरून क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट अर्ज वापरून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे, हनी ट्रॅपिंग इत्यादीसारख्या बेकायदेशीर प्रकार करुन घेतले जात होते. तरुणांची फसवणूक करण्यासाठी महाराष्ट्र, यूपी, बिहार, गुजरात, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांनी जाळे पसरले होते.
एनआयएकडून साहित्य जप्त
आरोपीच्या तावडीतून सुटलेल्या ठाण्याच्या सिद्धार्थ यादव या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. १३ मे रोजी ही तक्रार आली होती. मानवी तस्करीचा हा सिंडिकेट केवळ मुंबईत नव्हे तर देशाच्या विविध भागात कार्यरत असल्याचे त्यावेळी दिसून आले. या कारवाईमध्ये एनआयएने कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बोगस पासपोर्ट आणि इतर साहित्य जप्त केले आहे.