मुंबई : प्रतिनिधी
रेमल वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या १० किंवा ११ जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून १५ जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी २-३ दिवसांत मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्याने पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान ४४ ते ४९ अंशापर्यंत वाढण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्य सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, २९ मे पासून एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे. ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होऊ शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
कुठे पाऊस, कुठे उन्हाची काहिली
महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस होत असताना दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पंढरपूरमधील उजनी धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेली आहे तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यावरून भीषणता लक्षात येते