नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी सरकारकडून दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंना सूचना देण्यात आल्या आहेत.
दिल्ली सरकारचे जलमंत्री आतिशी यांनी अनेक भागात पाण्याचा अपव्यय पाहता जल बोर्डाच्या सीईओंना सूचना दिल्या आहेत. सरकारने जारी केलेल्या सूचनांमध्ये, दिल्लीत २०० पथके तैनात करावीत आणि पाण्याचा गैरवापर करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे म्हटले आहे.
मंत्र्यांच्या सूचनांनुसार, दिल्लीत पाईपने कार धुणे, पाण्याची टाकी ओव्हरफ्लो करणे आणि घरगुती पाण्याच्या कनेक्शनद्वारे व्यवसायासाठी त्याचा वापर करणे किंवा बांधकामाच्या ठिकाणी वापरणे हे पाण्याचा अपव्यय मानले जाईल. असे केल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
याशिवाय बांधकाम स्थळे किंवा व्यावसायिक आस्थापनांवर आढळून आलेल्या अवैध नळजोडण्या तोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या दिल्लीत प्रचंड उकाडा आहे आणि हरियाणा दिल्लीला त्याच्या वाट्याचे पाणी देत नसल्याने पाण्याची टंचाई भासू लागली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.