सोनभ्रद्र : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी देशात आज मतदान सुरू आहे. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातून मतदानावर बहिष्कार टाकल्याची बातमी समोर आली आहे. सुमारे ३० हजार मतदारांनी मतदानास नकार दिला आहे. मोबाईल नेटवर्क नसेल तर मतदान करणार नाही, असे या मतदारांच म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनभद्र जिल्ह्यातील जुगेल ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला असून, मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र ऐऊन हातात फलक घेऊन सत्ताधा-यांचा तीव्र निषेध केला आहे. यावेळी त्यांनी ‘मोबाईल नेटवर्क नाही, तर मत नाही’ अशा घोषणा ही दिल्या. या गावात सुमारे ३० हजार मतदार आहेत. या घटनेची माहिती मिळताच अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ आपल्या मागण्यावर ठाम आहेत. या मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे. दरम्यान, जुगेल गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे भाजपला मोठा फटका बसू शकतो, सोनभद्र मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. मात्र, या मतदारसंघात भाजपने कसलाच विकास केला नाही, असे ही या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे आहे.
मोबाईलला नेटर्वक नाही, मत का देऊ
बहिष्काराबाबत ग्रामस्थांचे प्रतिनिधी दिनेश यादव यांनी सांगितले की, गावात मोबाईल नेटवर्कची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. या समस्येबाबत राज्याचे मंत्री व लोकप्रतिनिधींना अनेकवेळा तक्रार करूनही त्यांनी या समस्येवर तोडगा काढला नाही. येथील लोक आपत्कालीन क्रमांकावरही कॉल करू शकत नाहीत. कोणाला मोबाईलवर बोलायचे असेल तर डोंगरावर चढून फोन करावा लागतो, यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला आहे, असे यादव म्हणाले.