नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांमधून आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला फायदा होताना दिसत आहे. मात्र, आम आदमी पक्षाचे नेते आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील ‘आप’चे उमेदवार सोमनाथ भारती यांनी हे सर्व एक्झिट पोल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. जर नरेंद्र मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले तर ते आपले मुंडण करतील. यावर भाजप नेत्याने त्यांना मुंडण करण्यासाठी कात्री पाठवल्याचे म्हटले आहे.
आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, माझ्याकडून लिहून घ्या मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाल्यास मी मुंडण करून घेईन. ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी दिल्लीतील सातही जागा जिंकेल. मोदीजींच्या भीतीमुळे माध्यम एक्झिट पोलमध्ये त्यांना पराभूत झाल्याचे दाखवत नाहीत, असा दावाही भारती यांनी केला आहे. जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, आपल्या सर्वांना ४ जूनच्या निकालाची वाट पाहावी लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, सोमनाथ भारती यांनी मुंडण केल्याच्या दाव्याची खिल्ली उडवत भाजप नेते तेजिंदर बग्गा यांनी त्यांना अॅमेझॉनवरून कात्री पाठवल्याची पोस्ट केली आहे.