नवी दिल्ली : नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेत नीटचा निकाल रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांची एसआयटी चौकशी करावी आणि ४ जून रोजी निकालावर आधारित समुपदेशन थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी ग्रेस गुण देण्यात मनमानी केल्याचा आरोप केला. या संदर्भात, असा युक्तिवाद करण्यात आला की अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले ७२० पैकी ७१८ आणि ७१९ सारखे उच्च गुण सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य आहेत.
विशेष केंद्रातील ६७ विद्यार्थ्यांना पूर्ण ७२० गुण मिळाले यावरही याचिकाकर्त्यांनी शंका उपस्थित केली. एनटीएने २९ एप्रिल रोजी प्रकाशित केलेल्या अंतिम उत्तर सूचीबाबत अनेक तक्रारी असल्याचेही सांगण्यात आले. नॅशनल टेंिस्टग एजन्सीद्वारे परीक्षेदरम्यान उशीर झाल्यामुळे ग्रेस गुण देणे ही काही विद्यार्थ्यांना ‘‘बॅकडोअर एन्ट्री’’ देण्याची वाईट प्रथा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्याची याचिका अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि डॉ. शेख रोशन मोहिद्दीन, मूळचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांनी दाखल केली होती. याचिकाकर्ते स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आहेत.
लखनौमधील एका विद्यार्थिनीचा व्हीडीओ व्हायरल होत आहे, तिने आरोप केला आहे की, निकालाच्या दिवशी तिला एनटीएकडून एक मेल आला होता ज्यामध्ये लिहिले होते की तिची ओएमआर शीट फाटली आहे ज्यामुळे तिचा निकाल तयार होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आयुषी पटेलने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे की, तिची ओएमआर शीट कोणीतरी जाणूनबुजून फाडली आहे.