नवी दिल्ली : कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत प्राण गमावलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह भारतात पोहोचले आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान आज सकाळी केरळमधील कोची विमानतळावर पोहोचले. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका बहुमजली इमारतीला बुधवारी भीषण आग लागली होती, ज्यामध्ये ४५ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला.
याशिवाय फिलिपाइन्समधील तीन लोकही या आगीचे बळी ठरले. कुवेतमध्ये लागलेल्या आगीत जीव गमावलेले बहुतांश नागरिक केरळचे रहिवासी आहेत. ४५ मृतांपैकी २३ लोक केरळचे रहिवासी होते. सात जण तामिळनाडूचे रहिवासी होते.
तर उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी ३ जणांचा या आगीत मृत्यू झाला आहे. याशिवाय ओडिशातील दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, झारखंड, बंगाल, पंजाब आणि हरियाणामधील प्रत्येकी एका नागरिकाचाही या आगीत मृत्यू झाला आहे.