नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज असून केव्हाही मोठा निर्णय घेऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या.
या राजकीय गोंधळात जनता दल (युनायटेड) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २९ जून रोजी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. नवीन एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी रणनीती यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते.
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यासाठी ते दिल्लीला जाणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरही सविस्तर चर्चा होणार आहे. यावेळी जेडीयूने १६ जागांवर निवडणूक लढवली होती आणि १२ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय जेडीयूचे दोन वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पुनरागमन झाले आहे.