28.9 C
Latur
Tuesday, October 22, 2024
HomeUncategorized१० लाख कावळ्यांना मारण्याचे फर्मान!

१० लाख कावळ्यांना मारण्याचे फर्मान!

भारतीय कावळ्यांमुळे केनियाला बसतोय आर्थिक फटका

नैरोबी : वृत्तसंस्था
भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केनियन सरकारने घेतलेल्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण १० लाख कावळे मारण्याचे उद्दीष्ट सरकारतर्फे निश्चित करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे कावळे हे केनियन परिसंस्थेत तेवढे महत्त्वाचे नाहीत, असे केनियन सरकारचे म्हणणे आहे. केनियम वाईल्डलाईफ सर्व्हिसच्या मते भारतीय कावळा हा परदेशी पक्षी आहे. तो मूळचा केनियन नाही. त्यामुळे किनारपट्टी भागातील शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी पक्ष डोकेदुखी ठरत आहे, अशी भूमिका मांडत केनियन सरकारने आगामी काही महिन्यांत १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय वंशाचे हे कावळे १९४० च्या आसपास पूर्व आफ्रिकेत आल्याचे सांगितले जाते. या कावळ्यांमुळे तेथील स्थानिक प्रजातींवर नकारात्मक परिणाम होतो की काय, अशी भीती केनिया तसेच इतर आफ्रिकन देशांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या भारतीय कावळ्यांमुळे केनियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम पडत असल्याचे तेथील स्थानिक आणि सरकारचे म्हणणे आहे.
केनियन सरकारला पर्यटनातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेसाठी पर्यटन व्यवसाय फार महत्त्वाचा आहे. मात्र केनियात येणा-या पर्यटकांसाठी भारतीय कावळे त्रासदायक ठरत आहेत. तसेच याचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे. पर्यटक हॉटेलमध्ये जेव्हा जेवत असतात, तेव्हा हे कावळे त्यांना त्रास देतात. अन्नाच्या शोधात असलेल्या या कावळ्यांचा पर्यटकांना त्रास होतो, अशा तक्रारी केनियातील हॉटेल व्यवसायिक करतात.
केनियातील शेतक-यांनी सुद्धा भारतीय प्रजातीचे कावळे त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. स्थानिक पत्रकारांशी बोलताना तेथील मावानजानी रुनया या शेतक-याने यावर प्रतिक्रिया दिली. नुकतेच उगवलेले पीक आणि कोंबडीची पिले हे या कावळ्यांचे अन्न आहे. त्यामुळे ही पिले कावळ्यांच्या भक्ष्यस्थानी सापडू नयेत म्हणून आम्हाला कित्येक महिने त्यांचे रक्षण करावे लागते. आम्ही लक्ष दिले नाही तर हे कावळे दिवसाला कोंबड्यांची २०-२० पिलं घेऊन जाऊ शकतात.
याच कारणामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन आता केनियन सरकारने या वर्षाच्या शेवटपर्यंत दहा लाख कावळे मारण्याचे ठरवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR