नवी दिल्ली : श्रेयंका पाटील दुखापतीमुळे महिला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडली आहे. २१ वर्षीय भारतीय ऑफस्पिनरच्या डाव्या हाताच्या चौथ्या बोटात फ्रॅक्चर झाले आहे, असे आशियाई क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात सांगितले आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे, जो पाकिस्तानविरुद्ध होता. त्या सामन्यात श्रेयंकाने गोलंदाजीत ३.२ षटकांत २ बळी घेऊन १४ धावा दिल्या होत्या. भारताने पाकविरोधातला हा सामना १५ व्या षटकातच जिंकला होता.
दरम्यान, दुखापत झालेल्या श्रेयंकाच्या जागी २६ वर्षीय डावखुरी फिरकीपटू तनुजा कंवरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तनुजाने भारताकडून अद्याप एकही सामना खेळलेला नाही. ती डब्ल्यूपीएलमध्ये गुजरात जायंट्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळते. डब्ल्यूपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर श्रेयंकाने डिसेंबर २०२३ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. यावर्षी ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होती. त्या स्पर्धेत तनुजाने १३ विकेट घेतल्या होत्या. सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांच्या यादीत ती पहिल्या स्थानावर होती.
डब्ल्यूपीएलमध्ये तनुजाने १२.०७ च्या सरासरीने आणि ७.३० च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. श्रेयंकाने भारतासाठी १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ दोन सामन्यांमध्ये तिला विकेट मिळवण्यात अपयश आले आहे. याशिवाय तिने तीन एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.