जयपूर : वृत्तसंस्था
प्रवाशांनी भरलेली एक जीप टँकरला जाऊन धडकली. याअपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ जण जखमी असल्याची माहिती आहे. हा अपघात सिरोही पिंडवाडा उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील कंताल पुलाजवळ झाल्याची माहिती आहेत. अपघात इतका भीषण होता की जीप पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जीपमधून प्रवास करणारे प्रवासी हे उदयपूरहून पालीच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून येणा-या टँकरची आणि या जीपची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की जीपचा समोरील भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली आणि जीपच्या दाराच्या काचा फोडून त्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सिरोहीच्या जिल्हाधिकारी अल्पा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्यांपैकी २ जणांना उदयपूरला रेफर करण्यात आले आहे. असे अपघात घडू नयेत, यातील त्रुटी दूर करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.