20 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeराष्ट्रीयतब्बल ४० लाख कोटी थेट लोकांच्या खात्यात

तब्बल ४० लाख कोटी थेट लोकांच्या खात्यात

१० वर्षांत गरिबांची सेवा, मोदी यांचे विरोधकांना उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आम्ही गरिबी हटावच्या खोट्या घोषणा दिल्या नाहीत तर आम्ही त्यांची खरी सेवा केली. आमच्या सरकारचे मॉडेल बचत आणि विकासाचे आहे. त्यामुळे १० वर्षांत कोट्यवधी रुपयांची बचत झाली आणि तब्बल ४० लाख कोटी रुपये लोकांच्या बँक खात्यात जमा झाले, असे सांगत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सत्ताकाळात झालेल्या कामांची यादीच वाचली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या अनेक आरोपांना उत्तरे दिली. आम्ही सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेची काही जणांनी खिल्ली उडवली. पण आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की, या मोहिमेमुळे देशात स्वच्छता नांदू लागली आहे. याच स्वच्छता मोहिमेमुळे अलीकडच्या काळात सरकारी कार्यालयांतून विकल्या जाणा-या भंगारातून २३०० कोटी रुपये वसूल झाले आहेत. महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे आम्ही फक्त विश्वस्त म्हणून काम करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशाने आम्हाला संधी दिली आणि जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. बचत आणि विकास हे आमचे मॉडेल आहे. जन धन, आधार, मोबाईल ही रत्न त्रिमूर्ती आम्ही तयार केली. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरण देण्यास सुरुवात केली. यातून आम्ही ४० लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा केले, असेही पंतप्रधान म्हणाले. आम्ही देशाचा पैसा हा शिश महाल बांधण्यासाठी वापरला नाही तर तो देश घडवण्यासाठी वापरला. पायाभूत सुविधांचे बजेट १.८० लाख कोटी रुपये होते. आज ते बजेट ११ लाख कोटी रुपये आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या उपचारासाठी सुमारे १ लाख २० हजार कोटी रुपये खर्च केले जातात. जनऔषधी केंद्रात औषधे खरेदीवर ८० टक्के सवलत आहे. जनतेसाठी ३० हजार कोटी रुपये शिल्लक आहेत, असेही मोदी म्हणाले.

एक लाख कोटींची बचत
गेल्या १० वर्षांपासून भारत हा उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. आम्ही इथेनॉलच्या निर्मितीचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची आयात कमी झाली. त्यावरील खर्च कमी झाला. या निर्णयामुळे १ लाख कोटी रुपयांची बचत झाली आणि ते पैसे लोकांच्या सेवेसाठी वापरले गेले, असेही पंतप्रधान म्हणाले.

१० कोटी बनावट लाभार्थी बाहेर काढले
या आधीच्या सरकारच्या काळात देशातील १० कोटी बनावट लोकांच्या नावाखाली अनेक योजनांचा लाभ घेतला जायचा. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर या १० कोटी बनावट नावांवर आम्ही फुली मारली. त्या योजनांचे खरे लाभार्थी आम्ही शोधून काढले. त्यामुळे सुमारे ३ लाख कोटी चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून वाचले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR