नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. तसेच त्यामध्ये ४८ जागांवर आघाडी घेत भाजपाने विजय निश्चित केला आहे. तर मागच्या १० वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाची २२ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. दिल्लीतील निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर इंडिया आघाडीमधील नेते आणि काँग्रेसकडून आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांना दिल्लीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आम आदमी पक्षाला विजय मिळवून देणे ही काही आमची जबाबदारी नाही, असं विधान केलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये आमचं राजकीय अस्तित्व आहे आणि आपण स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे, अशा विचार आम्ही केला होता. आता कोण काय म्हणतं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मला वाटतं की आम्ही चांगला प्रचार केला. आम आदमी पक्ष हा त्यांच्या अपयशामुळे पराभूत झाला आहे.