लातूर : प्रतिनिधी
महावितरणने मार्च महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून उन्हाची तिव्रताही दिवसेंदिवस वाढत आहे. मार्चच्या रखरखत्या उन्हाळयात गारवा हवा असेल तर वीजग्राहकांनी आपले थकीत वीजबील त्वरीत भरावे, अशी आर्त हाक महावितरणने जिल्हयातील वीजग्राहकांना घातली आहे. दरम्यान महावितरणने ४०४ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे.
गेल्या १० दिवसात २९ टक्केच वसुली झाल्याने उर्वरीत वीस दिवसात महावितरणला ९४ कोटी ६ लाख रुपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत बीजबीलांचा भरणा करुन सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करावी लागेल, असे आवाहन महावितरणने केले आहे.
वसुलीसाठी मंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी दारोदार फीरत आहेत, मात्र जिल्हयातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे भर उन्हाळयात वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय महावितरणसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. वीजबील न भरल्यामुळे गेल्या १० दिवसात ३५४ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे तर ५० वीजग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
लातूर मंडळा अंतर्गत येणा-या लघुदाब वर्गवारीतील १ लाख ४१ हजार ५६९ घरगुती ग्राहकांकडे ६८ कोटी ४ लाख थकीत असून कालपर्यंत ११ कोटी ९ लाख रूपये वसुली झाली आहे. व्यावसायिक वर्गवारीतील १० हजार ९९७ वीजग्राहकांकडे १८ कोटी ३ लाखांची थकबाकी असून कालपर्यंत ३ कोटी ४ लाख रुपये वसुली झाली आहे. तर औद्योगिक वर्गवारीतील ३ हजार ३८२ ग्राहकांकडे १७ कोटी ९ लाख थकीत असून या पैकी केवळ १ कोटी ८ लाखांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर इतर वर्गवारीत मोडणा-या ग्राहकांकडे ७ कोटी ७ लाख रूपयांची थकबाकी असून केवळ ५ लाखांची वसुली झाली आहे. येणा-या दिवसातील सार्वजनिक सुट्ट्यांचा कालावधी पाहता जास्तीत जास्त वसुली होण्याकरिता महावितरणची सर्व वीजबील भरणा केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी त्वरीत वीजबीलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.