नागपूर : प्रतिनिधी
नागपूर हिंसाचारात ३४ पोलिस जखमी झाले आहेत. ४ नागरिकांना जबर मार लागला असून ४५ वाहनांची तोडफोड झाली आहे. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्याचे आंदोलन काल झाले होते. त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार सुरू झाला. या घटनेत जवळपास ट्रॉलीभर दगड पोलिसांनी जमा केले आहेत. हा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर या घटनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता, विरोधकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस, जिल्हाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबत सकाळीच बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लागलीच पत्र परिषद घेतली. सोशल मीडियावरून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यावर लक्ष ठेवत आहे. तणावपूर्ण भागात पोलिस बंदोबस्त लावला आहे. नागपुरात हिंदू-मुस्लिम एकत्र राहतात. समाजकंटक जे नागपूरला कलंक लावत आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.
तर याप्रकरणी आता सर्वांनी अगोदर नागपूर शांत करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. घाईघाईने कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. या घटनेनंतर सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूर पोलिस या प्रकरणाचा शोध घेतील. सोशल मीडियाची खाती तपासली जातील. मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
विरोधकांना केले मोठे आवाहन
काही समाजकंटक या गोष्टी करत असतात. त्यामुळे राजकीय टिप्पणी करू नका. पोलिस आणि सर्वांना सहकार्य करा. आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे. आपला सलोखा कायम ठेवावा, असे बावनकुळे म्हणाले.
पोलिसांना सहकार्य करावे
सर्व समाजांनी, सर्वांनी अशा घटनेत शांत राहून शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ समाजकंटक आहेत. त्यांना शोधण्यासाठी आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासूनच या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्तांशी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. ही घटना वाढू नये, त्याचे पडसाद उमटू नयेत म्हणून प्रयत्न सुरू आहे. पोलिस अॅक्शन मोडमध्ये आहेत. पोलिसांनी प्रचंड क्षमतेने पुढाकार घेऊन ही परिस्थिती हाताळली आहे.
फडणवीस, गडकरींनी केले आवाहन
सोशल मीडियाने नागपूरचे वातावरण बिघडवले. अनेक सोशल मीडिया अकाऊंटमधून हे वातावरण भडकवले गेले. त्यातून दोन समाजात द्वेष निर्माण झाला. त्यातून ही घटना घडली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी आणि आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे युनिट शहर शांत करण्यासाठी काम करत आहे. सरकार म्हणून आम्ही सहकार्य करत आहोत. वस्त्या-वस्त्यात जाऊन लोकांना शांत केले जात आहे. राज्यात अशा घटना घडू नयेत यासाठी फडणवीस लक्ष देऊन आहेत. पोलिसांनी चांगल्या प्रकारे घटना हाताळली आहे. त्यामुळे होणारे मोठे नुकसान टाळले. दोन गटांतील मोठा संघर्ष टळला आहे. नागपूरमध्ये जिथे जिथे परिस्थिती अशांत आहे, तिथे योग्य संचारबंदी करण्यात येणार आहे. कुठेही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी पोलिस घेत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
एसआरपी आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. पुन्हा अशी घटना घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. पोलिस फोर्स अधिक आहे. आमचे लक्ष सोशल मीडिया अकाऊंटवर आहे. महापालिकेने, कलेक्टर, पोलिस आयुक्तांनी सकाळपासून आपापल्या विभागात अभियान सुरू ठेवले आहे.
या राड्याचा तपास सुरू आहे. ही घटना कुठून सुरू झाली आणि कुठे संपली याचा शोध घेत आहे. आज सर्वांना शांत करणे, शहरातील कामकाज सुरळीत करणे हे प्राधान्य आहे. मूळ शोधणारच आहे. पण आज प्राधान्य शांतता प्रस्थापित करणे, एक-दोन दिवसांत संचारबंदी उठवता येईल असे वातावरण करणे हे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.