नांदेड : प्रतिनिधी
नांदेड-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीचा काही भाग पुन्हा एकदा कोसळल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुलाखालील मार्ग तातडीने बंद करण्यात आला असून परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोणताही पाऊस अथवा नैसर्गिक आपत्ती नसताना संरक्षण भिंतीचा भाग कोसळल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या उड्डाणपुलाचा काही भाग यापूवीर्ही कोसळला होता. त्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. त्यावेळी संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आली होती. तसेच तज्ञांची एक टीम घटनास्थळाची पाहणी करून गेली होती. मात्र काही दिवसांतच त्याच उड्डाणपुलावरील संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळल्याने नागरिकांसह वाहनचालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
यापूर्वी उड्डाणपुलाचा भाग कोसळल्यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी चौकशी अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तर पालकमंत्री अतुल सावे यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही पुन्हा त्याच उड्डाणपुलावरील संरक्षण भिंत कोसळल्याने चौकशीचे निष्कर्ष काय झाले, दोषींवर कोणती कारवाई झाली आणि दुरुस्तीचे काम कोणत्या दर्जाचे करण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
















